Tuesday, 19 September 2017

एक साहित्यिक प्रेमकथा



एक साहित्यिक प्रेमकथा

audio on https://chirb.it/t0dbrF

गोष्ट तशी छोटीशी, पण आहे मोठी गम्मतीची
ऐकलंत का? गोष्ट तशी छोटीशी, पण आहे मोठी गम्मतीची
एक होतंआटपाट नगर”,
कारण सर्व सुरस कथा इथेच घडतात
तर एक होता आटपाट नगर,

आटपाट नगर होतं कलेचं माहेरघर,
संगीत, नृत्य, साहित्य, चित्रकला, शिल्पकला, अगदी सगळे इथे मिळून मिसळून राहत
इथला वारा  पण तालात वाहतो आणि नद्या पण सूरात बागडतात,
इथले आकाश मोठे गंमतीशीर होय- सूर्य, चंद्र, तारे, इंद्रधनुष्य, कापसासारखे  सफेद ढग आणि काळेभोर ढगसुद्धा सर्वांची एकत्रच हजेरी.
अरुणोदय, तिन्हीसांज, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सर्व इथे एकत्रच
कारण जिथे नांदतात सर्व कला तिथून निरोप घेण्याचे कुणाचेच मानस नसे.

तर ह्या कलात्मक आटपाट नगरीतील ऐकुया एक गोड प्रेमकथा
"लेखराव" आणि "अभंगकेश" बऱ्याच वर्षांचे शेजारी,
अनेक वर्षांचा शेजार त्यामुळे मैत्री अगदी घट्ट,
एकमेकांच्या घरात उठबस, मैफिली रंगवणं, गप्पा गोष्टी अगदी जोमात.

लेखरावांच्या सौभाग्यवती "कादंबरीबाई" आणि पुत्ररत्न "गोष्टदिप".
लेखराव आपले ठेंगणेसे पण दिसणं अगदी धारदार, कादंबरीबाई लांब सडक, मोहक.
गोष्टदिप लहानपणापासूनच लाघवी, अगदी सर्वांची मन जिंकणारा,
आता विशीतला राजबिंडा तरुण झालाय, उंचीचे वरदान आईकडून घेतलेय, काळेभोर डोळे, पिंगट कुरळे केस, नाकी डोळी धारदार अगदी वडिलांसारखा.
तर हा आपला नायक.

गप्पा तर काय ऐकाल ह्याच्या, सगळं रंगवून सांगायची सवय, थोडक्यात उरकणे माहितीचं नाही, ह्यावरून लेखरावांचे बरेच धप्पाटे खालले आहेत पण
कादंबरीबाईंना मुलाचे खूप कौतुक, रंगवण्याची सवय शेवटी त्यांचीच घेतलेली ना.
पण छक्के पंजे काहीच नाही हो - पोरगा अगदी सालस, समंजस, निष्कपट, निरागस,
सर्वांना गप्पा रंगवून सांगून झाल्या कि छान बोध पण सांगे.
गोष्टंदीपांचे बोध आटपाट नगरीत प्रसिद्ध होते.


आता जरा शेजारच्या घरात डोकावूया,
अभंगकेश आणि ओविबई अगदी भक्ती मार्गाने राहणारे जोडपं.
दोघेही विठू माऊलींचे भक्त, आटपाट नगरातील कोणालाही काही समस्या असो कि ह्यांची पायरी ओलांडलीच. अनेक वर्षांच्या भक्तीमुळे ह्यांना आयुष्याची कोडी सोडवणं अगदी सहज जमे.
दोघेही शांत, तत्त्ववेत्ता, पण एक काळजी त्यांना सतत सत्वे, त्या काळजीचे नाव
त्यांची कन्यारत्न – “कवितेश्वरी
ही आपली नायिका.

सालस, शांत, भक्ती अश्या शब्दांशी हिचे दूर दूर पर्यंत घेणेदेणे नाही!
सावळा रंग, इवलेसे नाक, गुलाबी ओठ, तपकिरी डोळे, भुरे, कुरळे केस
अल्लड, उत्साही, चंचल,
हिचं बोलणं तालात, हिचं चालणं तालात,
सतत वाहणाऱ्या झऱ्यासारखी, देवळातल्या मोठ्या घंटेच्या आजूबाजूला असलेल्या सर्व चिमुकल्या घंटा जर एकत्र वाजवल्या तर जो नाद होईल ना तो नाद म्हणजेच कविता - सर्वांना मंत्रमुग्ध करणारी!


गोष्टदिप आणि कवितेश्वरीची अगदी लहान पणापासूनची गट्टी.
एकत्र खेळणं, बागडणं, पण भांडण काही कमी नाही बरं का?
गोष्ट्या आपला बोध द्यायला लागला कि कविता खोट्या जांभया द्यायला तयार,
कवितेची बडबड सुरु झाली कि गोष्टदिपाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह,
अगं सरळ काय ते सांग ना,
असा गोल गोल काय बोलतेस?”
पण आपसात कितीही भांडण झाली तरी इतरांसमोर कायम एकमेकांना सांभाळायचे.
गोष्टदिपाचे कवितेच्या अल्हडपणावर कायम लक्ष असे तर कवितेचे त्याच्या साधेपणावर.


वर्ष जशी सरत गेली, इंद्रधनुषी बालपणाचे सोनेरी तारुण्यात रूपांतर झाले,
कवितेश्वरीला बोध आणि गोष्टदिपला यमक आवडू लागले!
कविता गोष्ट्याच्या रंगीत बोलण्यात आणि काळ्याभोर डोळ्यात बुडून जायची,
तर गोष्टदिप कवितेच्या तालबद्ध बोलण्यात आणि कुरळ्या केसात बुडून जायचा.
कादंबरीबाई आणि ओविबई तर काय, मैत्रीचं रूपांतर आता नात्यात होणार म्हणून मंडळ अगदीचं खुश!


पण इतक्या सहजसोप्प्यापणे पार पडली तर ती प्रेमकथा कसली नाही का?
आता प्रवेश खलनायकाचा, पण कवितेश्वरीचा नादाला लागण्याची हिम्मत असलेला खलनायक अख्या आटपाट नगरात नाही.... बरं आपण खलनायिका आणूया मग.

आपल्या सालस, निरागस गोष्टदिपावर बऱ्याच वर्षांपासून नजर ठेऊन होतीचित्रपटकिणी”
हिचं जग दिखाव्याचं, स्वतः कष्ट करता, सतत इतरांच्या घरात डोकावून ही पटकथा शोधे,
कारण पटकथेशिवाय हिच्या दिखाव्याला कोणी विचारतच नसे.
गोष्टदिपाच्या रंगीत गोष्टी, त्यांचे बोध, लोकांचा त्याच्या भोवतीचा जमाव
 हे सर्व पाहून चित्रपटकीणीने कट रचला.
गोष्टदिप रोज नदी किनारी सूर्यनमस्कार करत असे, तीच वेळ साधून हि बया गेली एकदा ठुमकत,
गोड गोड बोलून आपल्या सरळ, सालस नायकाला भुलवायचा खूप प्रयत्न केला.
पण गोष्ट्याला कविता समोर नसतानाही फक्त तीच दिसे सर्वत्र. चित्रेच्या गोड बोलण्यावर तो काही भुलला नाही. मग काय तर हिने खरंच भूल दिली! गोष्ट्याच्या नाकाला गुंगीच्या औषदाचा रुमाल लावला आणि बेशुद्ध झाल्यावर खेचत घेऊन गेली त्याला तिच्या घरी.

रोजच्या वेळी गोष्ट्या भेटायला आला नाही, उशीर झाला तरी घरी परतला नाही,
चाणाक्ष कवितेला लगेच सौंशय आला. नदीकाठी गेली तर पहाते काय, गोष्ट्याची एक चप्पल आणि बाजूला एक रुमाल, तिला लगेच समजले हा नक्कीच चित्रेचा कारनामा असणार.
नायिका आपली आहेच शूर, गोड शब्दाने जेवढी मंत्रमुग्ध करण्याची ताकत तिच्यात, तेव्हडीच धारदार शब्दांने चढाई करायचेही बाळ आहे कवितेत.
संतप्त कवितेचे रूप पाहूनच, चित्रेला घाम फुटला, आपलं जग दिखाव्याचं
 हिने हमला केला तर संपलंच मग सगळं, गप्पगुमान चित्रपटकीनी तिथून पळून गेली आणि
 कवितेने गोष्ट्याला जागं केलं.

“सारखं नाही हां मी तुला असं वाचवू शकणार, त्यापेक्षा माझ्या नजरेसमोरच राहिलेला बरा,
लग्न करशील का माझ्याशी?”
गोष्ट्याला काही झेपेना, अजून आपण बहुदा गुंगीतच आहोत असं वाटलं त्याला,
पण असलेली सर्व शक्ती एकवटून अगदी जोरजोरात मान हलवली त्यानं.

तर अश्या प्रकारे, आपल्या नायिकेंने केले आपल्या नायकाला प्रपोस आणि सूर्य, चंद्र, तारे, इंद्रधनुष्य, ह्या सर्वांच्या उपस्थितीत कविता आणि गोष्ट्याचं लग्न पार पडलं!
कवितेने उखाणा घेतला,
“अभंग, ओवी ची लेक मी, कविता माझे नवे
लेखराव, कादंबरीबाईंची झाले आज सून,
गोष्टंदीपचं नाव घेते, माज्यात तसे बरेच आहेत गूण!
कविता आणि गोष्ट्या एकत्र आलेत आता, वाट पहा जरा उखाणे येतीलच पटापटा!”

लग्नाला दोन वर्ष झाली बरं का,
गोड बातमी पण आली, कालच बारसं झालं
सुपुत्राचं नाव ठेवलयंपोवाडा
येईल भेटीला तोही लवकरच.






No comments:

Post a Comment