Tuesday, 28 May 2019

कान




You may listen to it here कान (pun intended)

दुःख
कोणालाच नको असतं,
भोगायला
पण सर्वांनाच हवं असतं,
दाखवायला
आधी वाटायचं दिखावा म्हणजे,
"पहा मी किती खुश आहे" दाखवणं
पण हल्ली जाणवायला लागलय,
दिखावा तर दुःखाचा होत आहे!
"माझा भार मोठा की तुझा?"
"तुला नाही समजायचं मी काय भोगतोय"
"काय सांगू, माझं नशीबाचं खोटं"
"आम्हाला कोणीच समजून घेत नाही"
"तुमचं काय बाबा, सगळं छान चाललंय"

उगाच मान हलवू नका, मी करते, तुम्हीही करता....

पण का आपल्याला आपलंच दुःख मोठं वाटतं?
का आपण दुःखाची पण स्पर्धा लावतो?
एखाद्याला सांगावी काही व्यथा,
तर तो सांगू लागतो आपलीच दुःखद कथा
मन मोकळं करायला कान आता उरलेच नाहीत
कारण ऐकायचं कोणालाच नसतं,
फक्त स्वतःचं रडगाणं गायचं असतं

आपल्या कडून कोणी अपेक्षा करू नये,
म्हणून ही रडारड का?
की कुठेतरी आपलं अपयश लपवण्याची पळवाट?
की इतकी संकटं असून पण,
"पहा आम्ही कशी मात करतो" ह्याचा पुरावा?
कदाचित प्रत्येकाची कारणं वेगळी असतील
आपणचं आपली कोळीष्टक विणतो
आणि अडकतो त्या जाळ्यात!
स्वतःत इतके गुंततो,
की तडफडणारा दुसरा कोणी दिसेनासास होतो
आणि हो कोणाचीच व्यथा खोटी नसते बरं का?!?
किंबहुना त्याला ती खरीचं वाटत असते
आणि तिची तीव्रता सांगणार्याला खूप आणि
ऐकणार्याला कमीचं वाटत असते
कारण ऐकणारा आपल्याच दुःखांची तीव्रता किती आहे
ह्याचा हिशोब करत असतो

कधीतरी
करू या का प्रयत्न,
स्पर्धा न लावता,
हिशोब थांबवून,
फक्त ऐकण्याचा?
नाही तर खांदा देताना खंत होईल
की आधीच कान द्यायला हवा होता......






Thursday, 16 May 2019

किशोरीताई, लेडी पु.लं व पॅनोरमा काका







रविवारची रमणीय संध्याकाळ, मी व माझा नवरा उर्फ “टकलू काका ”उर्फ “ड्रायवर” ज्याला कधीकधी “आदित्य” असही म्हटलं जात, फेरफटका मारायला निघालो.अर्थात चालत नाही! गाडीचे हफ्ते भरतोय म्हंटल्यावर वापर केलाचं पाहिजे! आम्ही मोशी ह्या अतिशय पावन ठिकाणी राहतो, एका बाजूला देहू तर दुसऱ्या बाजूला आळंदी. शहरापासून लांब असल्यामुळे आम्ही "कंट्रीसाईड्ला" राहतो असं कॉलर टाईट करून सांगतो. तर गेल्या रविवारी देहूला जाऊन पोहोचलो. तिथलं भंडारा डोंगर हे आमचं आवडीचं ठिकाण. तुकाराम महाराजांने त्यांचे अभंग ह्याच ठिकाणी लिहिले असे म्हणतात.  तिथे गेलं की असं वाटतं जणू अक्ख शहर आपल्या पायाशी आहे आणि आपण त्यावरून मुक्तपणे उडत आहोत.

छान वारा सुटला होता,अगदी सुरात होता, वरच्या मंदिरातल्या अभंगांचे स्वर पण त्यात एकजीव झालेले.
अल्लड वारा माझ्या लाल कुरळ्या बटांशी पकडापकडी खेळतं होता, तर आदिच्या चकचकीत टकला सोबत घसरगुंडी. सूर्यास्ताची वेळ होती, त्यामुळे नेहमी प्रमाणे माझं फोटो काढणं चालू होतं. नवऱ्याच्या नावाचा अर्थ सूर्य त्यामुळे आदि प्रमाणे तो सूर्यही मला सहन करतो. वॅनिला मिल्कशेक वर नारंगी बर्फाचा गोळा ठेवला की तो कसा हळू हळू वितळेल, मग बुडून जाईल आपलं “स्व” अर्पित करत आणि पांढऱ्या पेयाला नारंगी करेल, तसेच काहीसे सूर्याचे चालले होते. हो सहजासहजी मला खाण्याच्याचं उपमा सुचतात. त्यात सूर्याला बर्फाचा गोळा म्हणणारी खादाड ह्या जगात मी एकमेवचं असेन!असोत,तर एकूण सेटिंग तुम्हाला समजलं असेल, मग लेखाचं जे शीर्षक आहे त्या कडे वळूयात.







एक जवळपास साठीचं जोडपं तिथे आले. गाडीतून उतरताचं काका आपल्या मोबाईल वर तर काकू त्यांच्या मोबाईल वर फोटो काढायला लागले. पाच एक मिनिटांने मी हाक मारली, म्हटलं "काका, हल्ली आपण सगळे असेचं झालो आहोत ना? आठवणी तयार होतील ज्यांच्याकडे पाहून भविष्यात आनंद घेता येईल ह्या विचाराने फोटो काढत सुटतो. पण वर्तमानात त्याचा उपभोग घेणं बाजूलाच राहून जातं."काकांने मान हलवून म्हटलं " हा बघ पॅनोरमा, सॉलिड आला आहे ना?!?" पुढे काकू म्हणाल्या "मागच्या वर्षी युरोपला जाऊन आलो तेव्हा आम्ही सात हजाराचे फोटो प्रिंट केले अल्बम बनवायला" आम्ही लग्नाचा देखील अल्बम बनवलेला नाही हे ऐकून काकांने चमत्कारिक नजरेने आमच्याकडे पाहिलं. वयाची साठी ओलांडलेलं जोडपं पण तरी देखील पुढल्या प्रवासासाठी आठवणी जमवत होते. म्हणजे फोटो काढणे बरोबर की चूक? त्या क्षणाची मज्जा घेत काही आठवणी पण बनवणं असं संतुलन साधायला हवं. तसं संतुलन ह्या संकल्पनेचं आणि माझं फारसं जमत नाही! काही वेळाने पॅनोरमा काका काकू मंदिराच्या दिशेने गेले.


आठवणी तयार करणं, फोटो काढायची हौस आणि सोशल मीडिया वर मिळणारं वालीडेशन हे तीन हेतू पूर्ण होण्याइतपत फोटो काढून झालेले. मग स्वतःचाचं सल्ला घेऊन मोबाईल खिशात ठेवला आणि हलका नारंगी झालेला व्हॅनिला मिल्कशेक पाहत बसले. मस्त गप्पा झाल्या, ध्यान झालं, डासांचं पोट भरून झालं. अंधार पडल्यावर खालचं शहर आणि ताऱ्यांने चमकणारे आसमंत सारखेच दिसत होते. पण अंधार पडला की मला संगीत वाटणारं पक्षांचं गाणं, वाऱ्याचा आवाज, रातकिडे हे सगळे भूत पिशाच्यांचे आवाज वाटू लागतात, त्यामुळे चुपचाप परतीला लागलो.






किशोरीताईंची गाणी ऐकत छान ड्राईव्ह चालला होता. त्यात आम्ही दोघे गाऊन "अवघा रंग एक झाला" चे रंग उडवत होतो. किशोरीताई असत्या तर आमचं गाणं ऐकून त्यांना धडकी भरली असती! तेव्हड्यात मला तीन बायका दिसल्या. जरा ढाकचिक ढिंचॅक साड्या नेसलेल्या त्यामुळे अंधारात पण चमकत होत्या. चाकण MIDC त्यात रविवारची रात्र त्यामुळे सगळं सामसूम होतं. एकदम भयकथेची सुरवात वाटतेय ना? पण तसं काही नव्हतं. अर्थात मी फट्टू असल्यामुळे एक क्षण घाबरलेच होते. पण आदीने मात्र गाडी थांबवून त्यांना हात केला. येऊन एकीने विचारलं "रस्ता चुकला आहात का? कुठे जायचय?" मी म्हटलं "नाही ओ आम्ही इथे जवळचं राहतो, तुमच्यासाठी गाडी थांबवली. तुम्हाला कुठे जायचय?" एक दहा ते वीस सेकंद ती बाई फक्त माझ्याकडे पाहत होती. मग म्हणाली केव्हापासून हात दाखवतो आहोत, पाच सहा गाड्या गेल्या पण कोणी थांबलं नाही शेवटी चालू लागलो पण तुम्ही हात न दाखवताच थांबलात. तुम्हाला भेटण्याचा योग होता पहा." त्या तिघी बसल्या, एक आजी होत्या आणि दोघी चाळीशीच्या बायका. त्या नंतर ताथवडेला आजींना आणि चिखलीला त्या दोघींना सोडे पर्यंत किशोरीताई पण गप्प झालेल्या, आदी पण गप्प आणि कधी नव्हे ते माझीही बोलती बंद करण्यात आलेली. फक्त एकचं बाई बोलत होती श्वास न घेता! दोन वेळा पाण्याची बाटली पुढे केली तिलाही हातानेच नको म्हणत टेप चालुचं होती. माझं आपलं "हो का? अरेरे,अरे वाह, बापरे " एवढ्या शब्दांपुरताच बोलणं मर्यादित होतं. ड्रायवर साहेबांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल होती. आपल्या बायकोचं तोंड पण कोणीतरी बंद करू शकतं हे पाहून त्याचा आनंद उतू जात होता!


पण पॅनोरमावल्या काकांचा शब्द वापरायचा तर, सॉलिड एन्टरटेनिंग बाई होती. गप्पा रंगवून सांगणे ह्याचा अर्थ मला तेव्हा समजला. इंद्रधनुष्यात काय, इंद्राच्या दरबारात जेवढे रंग नसतील तेवढे सगळे वापरून बाई कथा सांगत होती. रंगपंचमीला सर्वात छपरी पोराच्या थोबाडावर नसतील इतके रंग त्या बाईच्या गप्पांमध्ये होते. हो दोन उपमा सुचल्या. मला दोन्ही आवडल्या म्हणून दोन्ही वापरल्या कारण "फुकट ए" (भाडिपा फॅन्स ना समजलं असेल). तर ह्या न थांबता रंगीत गप्पागोष्टी करणाऱ्या बाईला मी मनात "लेडी पु.ल" चा दर्जा देऊन टाकला. हि आमची आई, हि बहीण, आमचं माहेर अमुक गावचं, शेती तमुक गावची, कशा कशाची शेती आहे ह्याची यादी, मला दिलेली ह्या गावी, बहिणीला दिलेली त्या गावी, ते अगदी मुलीच्या लग्नात किती खर्च केला, तिला काय काय दिले म्हणजे "हुंडा म्हणून नाही हं" हा विशेष उल्लेख. एकूण त्यांचा पूर्ण परिवार, नातेवाईक, भाऊबंद, मैत्रिणी, शत्रू ह्या सगळ्यांची माहिती दिल्यावर म्हणाली "आता गंमत सांगते खरी"! तर त्या तिघी एका लग्नाला गेलेल्या जिथे वधु वर मुहूर्तावर आले नाहीत आणि ह्यांचा जेवणाचा मुहूर्त चुकला. अक्षता टाकून म्हणे पळालो जेवायला तर लोकं लग्न लागायचा आधीचं लाईन लावून उभी. आणि आमच्या म्हातारीला नाही ना पळता आलं! बाहेर अंधार झालेला पाहून तश्याच निघाल्या.

लग्नाची सर्व माहिती अगदी इत्थंभूत सांगण्यात आली. मुलगा कुठचा, काय करतो, मुलगी कुठची, काय करते, कुठे कुठे आणि किती किती शेती, किती खर्च आला असेल ह्याचा अंदाज, हुंडा शब्द न वापरता मुलीला दिलेले अनेक घरातले सामान, अक्षतेत एकूण तांदुळाचे किती दाणे पडले, मुलाच्या मावशीच्या मैत्रिणीच्या मुलीच्या बहिणीच्या आईने नेसलेल्या साडीचा रंग..... तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्या लग्नावरून त्यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय आला. त्यांना लग्न छोटं करायचं होतं पण मुला कडच्यांना मोठं कार्यालय हवं होतं. इथे गावाकडे कार्यालय म्हणजे साधंसुधं नसून मोठ्या मैदानांना जोडलेलं असतं. होर्डिंग लावून अख्या जगाला बोलावण्यात येतं, आणि शान काही विचारू नका. एक नवरदेव हेलिकॉप्टरहुन लँड झालेला आम्ही आमच्या गरीब डोळ्यांने स्वतः पाहिलेलं आहे. पण इथली लग्न हा एक मोठा आणि मजेशीर विषय आहे, तो नंतर कधीतरी सवडीने सांगेन. तर हो आपल्या लेडी पुलंच्या मुलीच्या सासरच्यांने एक स्विफ्ट आणि एक बुलेट पण मागितली होती. "सगळेच देतात ओ आमच्यात म्हटल्यावर दिलं आम्ही पण. शेवटी स्टेटसचा प्रश्न आहे. आणि आता मुलाच्या लग्नात होईल ना वसुली!" हे सगळं ऐकून मला वेगळ्याच जगात डोकावतेय असं वाटलं. आपण आपल्याच सारख्या लोकांमध्ये मिसळत असतो त्यामुळे आपल्या विहिरी बाहेर खरोखर समाजात काय चाललंय ह्याची आपल्याला अजिबात माहिती नसते. फेसबुक वर हुंडा बंदी, घरगुती हिंसा, भ्रूणहत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अश्या अनेक विषयांवर चर्चा करतो, वाद घालतो, कोणी “भक्त” तर कोणी “लेफ्टिस्ट” तर कोणी “इंटलेकचुअल” असे लेबल लावत सुटतो पण वस्तुस्थिती खरचं माहित असते का आपल्याला?

"ओ ताई कुठे हरवलात? आता गंमत सांगते खरी!" बाईकडे फारच गमती होत्या सांगायला. "परवाच आम्ही एका मुलीला पाहायला गेलो होतो." "परवा" हा शब्द कालच्या आधीचा किंवा उद्याच्या नंतरच्या दिवसा पर्यंत सीमित नसतो. भूतकाळात कधीही झालेल्या गोष्टीला "परवा" वापरला जातो. उदाहरणार्थ

"परवाच महाराजांचा राज्याभिषेक झाला", "परवाच न्यूटनच्या डोक्यावर अँपल पडलं", "परवाच माझा जन्म झाला" आणि हो माझ्या आजीचा सुद्धा परवाच झाला! तर अश्या भूतकाळातल्या कुठयलातरी “परवाला” ते मुलगी पाहायला गेले होते. बाई म्हणाल्या "कार्यक्रम छान झाला, सगळं ठरल्यातच जमा होतं पण तेवढ्यात मुलीचे वडील म्हणाले "पन्नास हजार". आम्हाला वाटलं न सांगताच इतकी रक्कम देत आहेत म्हणून आम्ही “कशाला उगाचं” वगैरे पुटपुटून “चालेल आता इतक्या प्रेमाने देत आहात तर” असं म्हणालो. तर ते हसून म्हणाले “तेवढे दिलेत तरच मुलगी देईन!” हि चमत्कारिक मागणी ऐकून आम्ही निमूटपणे तिथून निघालो." आदि ने सुद्धा रस्त्याच्या कडेला गाडी लावून आ वासून मागे पाहिले. त्या पुढे किती मुली पाहल्या वगैरे सांगत होत्या पण मी मात्र रिव्हर्स हुंड्या वरच अडकले होते. समाजात सुधारणा व्हावी व आपली मुलगी मूल्यवान आहे असं समजून रक्कम मागितली की मुलीला विकण्याचा प्रोग्रॅम होता! मला नक्की काय ते समजेना.

"तुकारामांची टाळ आमच्या गावात पडली" असं ऐकलं आणि हुंडा विषय संपल्याचे समजले. बाई एका विषयावरून दुसऱ्या विषयावर ऑलिम्पिक लॉन्ग जंप रेकॉर्ड करण्याच्या हेतूने उड्या मारत होती!
तर तुकारामांने वैकुंठ प्रवासाची सुरवात देहू वरून केली असं मानतात, माझ्या भाचीच्या शब्दात सांगायचं तर देहू वरून टेक ऑफ केला गरुडाने! तर आपल्या लेडी पु.ल कडून आम्हाला समजले कि त्यांची टाळ चिखलीला पडली म्हणून तिथल्या कमानीवर मोठी टाळ बनवली गेलीय.

मग आजी गाडीतून उतरल्या. भरभरून आशीर्वाद दिले जणू आम्ही त्यांना स्वतःची किडनी दिली आहे! साधी लिफ्ट दिल्याचं त्यांना इतकं कौतुक वाटलं कारण इतर कोणी त्यांच्यासाठी थांबलं नव्हतं. त्यांच्या आशीर्वादाने संतोष वाटायचा सोडून वाईट वाटलं. ह्या जलद जगात इतकी साधी मदत करायला देखील कोणी थांबत नाही. वर्तमानपत्रात अनेकदा वाचतो आपण अपघाताने माणूस रस्त्यावर पडलेला ज्याला कोणी मदत केली नाही आणि त्यानं जीव गमावला. कोणीतरी भल्या इसमाने मदत केली, हॉस्पिटलला नेले हे मात्र खूप कमी वेळा वाचण्यात येतं. मानवातील माणुसकी खरंच लोप पावतेय का?

"आता एवढ्या उशिराच्या लग्नांना जायचं नाही आई तू" आजींना ओरडून सांगण्यात आलं. नंतर न विचारताच आम्हाला सांगितलं "आमचा थोरला आणि धाकटा भाऊ दोघेही पाटोपाट गेले, त्यामुळे आईला इच्छा असेल तिथे नेतो. " अश्या वेळी काय बोलावं काही समजत नाही. पण आम्हाला फार विचार करायला लागला नाही कारण बाईंने विषय चुटकीसरशी बदलेला. मग चिखली आल्यावर मनापासून चहाला या असा आग्रह केला गेला. "पोहे करते" हे दोन शब्द ड्रॉयवरच्या कानावर पडताच त्याच्या चेहऱ्यावर तेज आलं. तो काही बोलण्याच्या आत मी म्हटलं येऊ सवडीने कधीतरी, आता घर समजलंय. जरा हिरमुसूनचं ड्रायव्हरने गाडी सुरु केली.




डोक्यात बरेच विचार आले, किती विषयांकडे पाहायचा नवा दृष्टिकोन सापडला अवघ्या पाऊण तासात. टेकडी वरचे फोटोवाले काका काकू जे सात हजारचा अल्बम बनवतात ते जेवायला लाईन म्हणून असेच निघून अंधारात चालणाऱ्या त्या तीन बायका, बराच मोठा प्रवास घडला होता एका संध्याकाळीत.
आम्ही बरेचदा अनोळखी लोकांशी बोलतो, मला मुंबईत रिक्षा टॅक्सिवाल्यांशी बोलून झालेली सवय. पुस्तकांमध्ये, चित्रपटांमध्ये कधी सापडणार नाहीत अश्या गोष्टी ऐकायला, पाहायला मिळतात.  
बोरिवलीला स्टेशनहून घरी जाताना एकदा "कांदिवलीचा बच्चन" म्हणून ओळखला जाणारा रिक्षा ड्रायवर भेटलेला. महेश्वरला नर्मदा काठी एक आजोबा भेटलेले जे शिक्षक म्हणून रिटायर झालेले आणि आम्हाला पाढे  कुठपर्यंत येतात विचारत होते. पवनाहून येताना एका तरुण जोडप्याला लिफ्ट दिलेली जे हॉस्पिटलचे कर्मचारी होते. तो पोरगा आम्हाला नक्की हॉस्पिटला या असं चार वेळा सांगत होता आणि त्याची मैत्रीण त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत होती. मैसोरचे अतिशय गोड आजी आजोबा ज्यांने भरपूर मासे खाऊ घातलेले कारण पहिल्या दिवशीच काय आवडतं विचारल्यावर आदी जोरदार आवाजात फिश बोलला होता. मांडूला भेटलेले फ्रेंच बोलणारे गाईड,अथिरापलीला भेटलेले गुजराती कुटुंब ज्यांचा जन्म लंडनचा होता आणि राहत केनियात होते! लांगकावीला भेटलेल्या ऑस्ट्रेलियन बहिणी ज्यांने मराठीत ऑंटीला काय बोलतात विचारलं  होतं आणि मग आम्हाला मावशीच म्हणायचं असं जाहीर केलं होतं. आदिला, "you should help your wife in household chores" धपाटा मारून सांगितलेलं!

असे निरनिराळ्या छटांचे लोक भेटले. खरंच लेडी पु.लं म्हणाल्या प्रमाणे ह्या सर्वांना भेटायचा योग होता.
आमच्याकडून त्यांना काही मिळालं का ठाऊक नाही पण त्या सर्वांकडून आम्हाला खूप काही नवीन ऐकायला, शिकायला, विचार करायला मिळालं. 

इतरांशी ओळख पुन्हा कधीतरी जरूर करून देईन.




Friday, 10 May 2019

मम्मा



You can listen to this on-

दोन दिवस खूप डिस्टबर्ड होते, कारण काय ओ, नेहमीचं
तुमचं आमचं सारखाचं - "नाती"...

नाती म्हणजे ना एक न उलघडणारं कोडं आहे.
"त्यांना जपावं, ती तोडू नयेत, रक्ताची नाती म्हणजे सर्वात घट्ट" वगैरे वगैरे, आपण नेहमीचं ऐकतो.

हल्ली व्हाट्सएप वरचे मेसेज तर संस्कार चॅनलला टफ देतात! पण वस्तुस्थिती काय आहे? काय असते?
तुमची आमची सारखीचं....

काही नाती रक्ताची असो, जवळची असो नाही टिकत 
कारण प्रयत्नसुद्धा दोन्ही बाजूने व्हावे लागतात.
काही जणांचा स्वभाव, आयुष्याचा दृष्टीकोन, विचारपद्धती
हे काही केल्या नाही जुळत आपल्याशी.
मग का बळजबरी हे नात्यांचे धागे बांधून ठेवावे?
हे धागे नसून बेड्या होऊन जातात!

प्लेन मध्ये सांगतात पहा इमरजंसी मध्ये पहिले स्वतःला ऑक्सिजन लावावे आणि मगचं दुसऱ्याची मदत करावी
तसं काहीसं इतेही लागू पडतं. आपलं मानसिक संतुलन टिकवणं सर्वात महत्वाचं, त्यानंतर तुमच्या जवळच्या काही लोकांना, नात्याने नव्हे हं, मनाने जवळ असलेले त्यांना जपावं. बळजबरीच्या नात्यांने फक्त त्रास होत असेल 
तर ती कीड वेळीचं आपल्या आयुष्यातून काढायला हवी!

आपल्या सर्वांनाच हा अनुभव असेल की मैत्रीची नाती किंवा कधीकधी काहीही संबंध नसून अचानक एखाद्या प्रसंगामुळे झालेली नाती ही जास्तं जवळची ठरतात.
आपल्या सुखात मनापासून खूश होणारे, आपला मत्सर न करणारे, आपल्या दुःखात खरं सांत्वन देणारे, प्रसंगाच्या वेळीस मदत करणारे, हेचं खरे नातेवाईक!

ह्यात आणखी एक ट्विस्ट असतो बरं का?!?

"मी ना त्याला दहा तोळ्याची मदत केलेली, त्यानं मात्र मला पाचंच तोळ्याची केली, कसं कदर नाही पहा!"

"वीस वर्षांपूर्वी आम्ही मदत केली नसती तर आज हा इथे नसता, त्यामुळे त्याच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय हा आम्हाला विचारूनचं घेतला गेला पाहिजे! त्यांने आयुष्य कसं जगावं हे आम्ही ठरवणार!" 

"हो केलं मी त्याचं नुकसान, तर काय झालं? मागे मी मदत केली नसती तर काय झालं असतं?"

असे एक ना अनेक प्रसंग तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलेले असतील. मदत सोन्यासारखी तोलूनमापुन करणारी लोकं.
नात्यांच्या हिशोबाचा एक स्पेशल फोल्डर कायम ह्यांच्या डोक्यात तयार असतो! नात्यात हिशोब आला की नात्यांचं डीमोनेटायझेशन झालचं म्हणून समजा!

नाती टिकवण्याचा प्रयत्नचं करू नये असं माझं मुळीचं म्हणणं नाही, जरूर करावा पण सारखचं तोंडावर पडत असाल तर काही तोंडं न पाहिलेलीचं बरी!

डोक्यात त्रागा असल्यांने ह्या वर अजून खूप लिहू शकेन
पण मग ते टोकाचं होईल. सायकायट्रिस्ट वर इतके पैसे खर्च केले आहेत की ते म्हणतात तसं बालन्सड राहण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे!

तर डोक्यात वाफ जमून जमून जेव्हा शेवटी माझी शिट्टी वाजली तेव्हा नकळत मम्माला फोन लावला गेला. इकडची तिकडची चौकशी केली पण तिला बहुदा आवाजा वरूनचं समजलं की हिची शिट्टी वाजलेली आहे!

"तू काय म्हणतेस?" हे तीन शब्द ऐकताच, माझी वरबल डिसेंटरी सुरू झली. आधी राग, मग रडणं, मग ओशाळणं,
मग "तुला उगाचं त्रास दिला" ह्याचा अपराधीपणा वाटून घेणे
अगदी ठरलेली सायकल!

अशा वेळी मम्माचं लागते ना? बाबा कितीही जवळचे आणि अगदी व्यवस्थित विचार मांडणारे वगैरे असले तरी ते योग्य तेच बोलणार म्हणजे तुमच्यासाठी योग्य नाही हं, समाजात जे योग्य मानलं जातं ते! 
"सगळीकडे असचं असतं", 
"तुझही चुकतंय", 
"एवढा राग कशाला यायला हवा?" 
"आपल्याहून मोठे प्रॉब्लेम्स असणारे किती लोकं आहेत?" "तुझं कमीतकमी हे आणि ते तरी चांगलय!" 
असे शहाणपणाचे बोल ऐकण्याची आपल्या मनाची तयारी नसते कारण शिट्ट्या ऑलरेडी वाजलेल्या असतात! 
अश्या वेळी मायेची हळुवार फुंकरचं लागते (व्हाट्सएप वरच्या मेसेजेसचा परिणाम!) 

मम्मा मात्र शांतपणे ऐकून घेते, हो ला हो म्हणते, 
"तुझं अगदी बरोबर आहे" सांगते, जे ऐकायला आपण सर्वात जास्तं उत्सुक असतो!
पण हळूच एक "पण" पण टाकते
"सगळं बरोबर आहे तुझं पण जरा असा पण विचार करून पहा." सावधपणे सल्ला देते. 

शेवट कायम ठरलेला,
"काही खाल्लं आहेस का? आधी खाऊन घे...
थोडा वेळ झोप निवांत...लोकांचा विचार करू नकोस... नाही तर इथे येतेस का सरळ काही दिवस?"
थांबलेले अश्रू पुन्हा गळू लागतात. मग नंतर फोन करते म्हणून फोन ठेवायचा.

रडून डोकं दुखत जरी असलं तरी हलकं वाटतं. 
काही विशेष मार्ग वगैरे सापडलेला नसतो.
परिस्थितीही काही बदललेली नसते.
नात्यांचा गुंता तसाच राहतो.
पण बदला असतो आपला दृष्टिकोन,
आतून एक उर्जा मिळते चालत राहण्याची..

दगड फेकणारे कधीच कमी होणार नाहीत पण आपण आपल्याला ते किती लागू देतोय हे अपणाचं ठरवायचं
आणि जखम बरी करायला आहेचं "मम्मा"....

Tuesday, 7 May 2019

तीन बोजी


I saw this amazing pic clicked by Prachi Gadkari while scrolling on Instagram.
The contradictions in this visual were so strong that I couldn't resist writing something based on it...




तीन बोजी

काळवंडलेल्या भिंतीवर चिकटवलेली पत्रकं
सगळ्या देवदेवतांची हजेरी आहे
शिव, कृष्ण, गणपती, साईबाबा
दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती
धर्म विकणं काही साधीसोप्पी गोष्ट वाटली का?!?

असो, तर ह्या सर्वांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेत,
ह्या पुण्यवान भिंतीचा आधार घेत,
क्षणभर विसावा घेतलाय 
आपल्या तीन नायकांनी, त्यांच्या बोज्यांसह

एक बोजा तारुण्याचा
कपड्यात आहे यौवनाची हिरवळ,
चेहरा मात्र त्रस्त
भविष्याचा विचार करत असेल का तो?

एक बोजा वर्तमानाचा
सौभाग्याची लख्ख गुलाबी साडी,
हात मात्र कपाळावर
कदाचित विचार करतेय सद्य स्थितीच्या ताणांचा

एक बोजा उतार वयाचा
पांढरे केस, डोक्यावरून पदर,
अविर्भाव विचारात मग्न असल्याचे
बहुदा भूतकाळात हरवलीय ती

काय गम्मत आहे ना?
प्रदर्शन मांडलंय देवांचं,
धर्म विकणार्याने ह्या भिंतीवर
काळचक्रात अडकलेल्या आपल्या नायकांनसाठी मात्र
काही काळ पाठ टेकायला जागा आणि सावली,
ह्या खेरीज बाकी काहीच करू शकत नाहीय
ही "पुण्यवान" भिंत...

एकीकडे आहेत ही मेहनती लोकं,
पोटापाण्यासाठी रोज धडपड करणारी,
रक्ताचं पाणी करून पैसे कमावणारी
तर दुसरीकडे आहेत धर्माचा धंदा करणारी,
धर्मा वरून रक्त सांडणारी,
देवांचं मार्केटिंग करणारी!
मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल सारखी
देवांची पत्रकं चिकटवणारी!
तसं देवही मोस्ट वॉन्टेडअच आहे म्हणा
कारण कष्ट करण्यापेक्षा,
हात जोडणे केव्हाही सोपेच!

माडगूळकरांचे शब्द आठवले -
"देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी..."

देवळात, मस्जिदित, चर्च मध्ये
अश्या एक ना अनेक प्रार्थनास्थळात,
राजकारणात, धर्मात, पत्रकात
कैद केलीय आपण आपली देवाची संकल्पना
ह्या अश्या परिस्थितीत,
चराचरात असलेला, आपल्यात असलेला,
देव आहे का जागा?!?

काळाच्या घावांवर फुंकर मारणारा
कोणी सापडेल का आपल्या नायकांना?!?